कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा! : एक अनुभव

✍🏻 गजानन खंदारे रिसोड

आज सकाळपासूनच साहेबांच्या समर्थकांच्या पोस्ट्स स्थानिक मीडियावर फिरत होत्या —
“बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांची साहेबांनी आस्थेने कशी चौकशी केली!”
अशा “टेबल” बातम्या काही वृत्तपत्रांतही झळकल्या होत्या.

दुसरीकडे, सोशल मीडियावर लोक एकमेकांना बुद्ध जन्म दिवसाच्या शुभेच्छा सांगत होते.

रिसोडहून येताना एका झाडाच्या सावलीखाली काही हालचाली दिसल्या.

मी नकळतपणे त्या दिशेने वळलो.

तिथे आयुष्याच्या दुःखाने सावळलेले चेहरे, थकवा आणि भीतीने भरलेली डोळे –
अशा १२-१३ जणांचा एक समूह रात्र होण्याची वाट पाहत होता – महिला, लहान मुले, काही पुरुष…

संचारबंदीत दिवसा भीतीने लपून राहायचं, आणि रात्रीच्या अंधारात चालत सुटायचं.
असा तो प्रवास – तब्बल १३ दिवसांचा आणि ४०० किमीचा!
त्यांच्या पायांची चामडी अक्षरशः सोलटली होती.

आमच्या काही साहेबांना फोन केले.
पण प्रत्येकाने सॅनिटायझरने धुतलेले हात झटकले!

अखेर तालुका दंडाधिकारी यांना फोटो पाठवून फोन केला.
त्यावेळी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कॉन्फरन्स कॉलवर होते.

“आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना जिल्ह्यात परवानगीशिवाय प्रवेश कसा झाला?”

मदत कशी करताय, तुम्ही पण कायदा मोडताय?
– प्रतिबंधात्मक कारवाईची अशी त्यांची प्रशासकीय भाषा सुरू होती.

मात्र, मी त्यांच्याशी बुद्धाच्या करुणेची भाषा बोलत होतो.
दंडाधिकाऱ्याचा
“शेलार” या आडनावाचा इतिहासाशी असलेला संदर्भ जागवत होतो.

शेवटी कायदा हरला.
आणि बुद्ध जिंकला.!

कारण याच दिवशी दुःखाच्या निवारणासाठी बुद्धाचा जन्म झाला होता.

जीवघेणी पायपीट थांबून मजूर त्यांच्या गावी सुखरूप गेले होते.
राज्यातील ही पहिली व एकमेव घटना होती.

दुसऱ्या दिवशी साहेबांऐवजी माझ्याच नावाची चर्चा होती.
राज्यभरातून, परराज्यातून मदतीसाठीचे फोन येऊ लागले.
सोबत..
शेकडो मदतीचे हात मदतीसाठी पुढे येत होते.

पण त्या यादीत साहेबांचे नाव मात्र कुठेच नव्हते!
आणि…
“लॉकडाऊनमधील हिरो” ठरवताना साहेबांच्या पुरस्कारांच्या यादीत खऱ्या मदती करणाऱ्यांची नावंही नव्हती!

पुरस्कारांच्या राशींपेक्षा बुद्धांचा अष्टांगिक मार्ग समजून घेणं मला अधिक प्रिय आणि अर्थपूर्ण वाटतं.
© blog.lagnaakshada.com
बुद्ध जन्मदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *