पटतंय का पहा! नाही सोडून द्या….
राजकारणात कोटींची उड्डाणे आणि गुळगुळीत भाषणे यांचा खेळ नेहमीच रंगत असतो.
पण लाक्षणिक अर्थाने जेव्हा आमदार गुळगुळीत रस्त्यावर स्वतःच घसरतात, तेव्हा जनतेच्या भुवया उंचावतात!
अर्थात काल रविवार असल्यामुळे मोबाईल वरून स्वाईप होणाऱ्या बोटांचा अपवाद सोडला तर अनेकांच्या मेंदूला व हाताला तसा आरामच असतो.!
मोप (ता. रिसोड) येथील कुमारेश्वर महादेव मंदिर परिसरात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांनी पांदण रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला.
सकाळी 11 वाजता अकस्मात अवतरलेल्या भावनाताईंना पाहून मोपवासीयांचा उत्साह फुलला. त्यांच्याबद्दलचा आदर आणि उत्साह सभागृहात दिसून आला.
.देवापुढे नतमस्तक झाल्यावर भावनाताईंनी माइक हाती घेतला आणि विकासाच्या “कोटींचा” वर्षाव सुरू झाला. “रिसोड आगाराला पाच नव्या कोऱ्या बसेस मिळाल्या. यासाठी कोणाचे प्रयत्न? कोणाचा खर्च?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी श्रेयाचा मुद्दा कुरकुरत्या पापडासारखा कुरकुरीत केला. पण खरा टोला आला, जेव्हा त्यांनी पांदण रस्त्यावरून डांबरी जोड रस्त्याकडे मोर्चा वळवला.
“काँग्रेसचे आमदार अमित झनक फोटो काढायला पुढे, पण रस्ते कुठे?”
हा खडखडीत टोमणा उपस्थितां पैकी काहींना कळवळा तर काहींना वळवळ निर्माण करणारा ठरला!
अधून मधून टाळ्या वाजत एकदाचा कार्यक्रम संपला पाहुणे निघून गेले. आता बारा वाजता त्याच ठिकाणी अकोला जिल्हा बँकेच्या सहकार प्रबोधनाचे वेगळ्या कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरु झाले.आ.अमित झनक संचालक म्हणून मंचावर विराजमान झाले. त्यांनीही कोटींच्या उड्डाणाचा हक्क सांगितला. “कोण म्हणतं रस्ते नाहीत? मी ज्या रस्त्याने आलो, तो तर गुळगुळीतच होता !
स्टे उठवल्यावर आम्ही रस्ते गुळगुळीत केले!” असा जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी भावनाताईंचा आक्षेप खोडला. एकीकडे पांदण रस्त्यावर मुरूम, तर दुसरीकडे जोड रस्त्यावर डांबर – असा हा शाब्दिक खेळ रंगला! या सगळ्या कोटी आणि टोमण्यांमागे एक गोष्ट स्पष्ट आहे – जनतेला खरं तर विकास हवाय, गुळगुळीत भाषणे नाहीत! दोन्ही आमदारांनी केलेली कामे नक्कीच कौतुकास्पद आहेत.
भावनाताईंनी पांदण रस्त्यावर मुरूमाचा थर घालण्याचा संकल्प सोडला. तर झनकांनी रखडलेल्या रस्त्यांना गती देण्याचा!. पावसाळ्यापूर्वी पांदण रस्त्याचं भूमिपूजन, नव्या बसेस, सहकार दिनाचं आयोजन आणि जोड रस्त्यावर डांबर हे गावासाठी सकारात्मक पावलं आहेत.

पण या सगळ्यात एक खंत आहे – दोन्ही आमदार परस्पर पूरक असताना, कार्यकर्त्यांच्या चुगल्या आणि छोट्या संवादांमुळे त्यांच्यातील स्पर्धा अनावश्यक ताण निर्माण करते.
तेव्हा दोन्ही आमदारांनी अशा छोटया संवादाच्या चुगल्या सांगणाऱ्या कार्यकर्त्यां पासुन मोजून साडेतीन हात लांबच राहावे.
दोघांनीही एकमेकांना सहकार्य करून विकासाला गती दिली, तर गाव उत्क्रांतीच्या पटांगणावर खऱ्या अर्थाने ‘लॅण्ड’ होईल! शेवटी,जनतेचं एकच सांगणं – “कोटी कमी, खडखडीत काम जास्त हवं!” राजकारणात व्यंग आणि विनोद चालतो, पण रस्त्यावर कोणी घसरू नये. कारण आता जनता गुळगुळीत भाषणं नव्हे, तर गुळगुळीत रस्ते आणि ठोस विकास मागते!

Disclaimer
Blog.kamachya-goshti.com & Blog.lagnaakshada.com:
The content of this blog post is intended for informational and entertainment purposes only. The opinions expressed are those of the author and do not reflect any official stance or political affiliation. Any resemblance to actual persons or events is purely coincidental. Readers are encouraged to verify facts independently where necessary.


Thank